एक व्हिडिओ (दूरचित्रवाणी) बघितला आणि या विषयावर पण लिहावं वाटलं.. खरं तर मला हा प्रश्न नेहमीच पडतो की आताच्या मुलांचं काय होईल? आपल्या मराठी भाषेचं काय होईल? कारण इंग्रजी शाळेतून शिक्षण घेताना आताच्या मुलांना इंग्रजीच बोलावं लागतं आणि खूपच खूप तर जरा हिंदी ..मग आपल्या मातृभाषेच काय, आहे ना विचार करण्यासारखा प्रश्न?
मी खूप जवळून अनुभव सुद्धा घेतलाय. आजूबाजूच्या परिसरात काही मुलं भाषेची खिचडी करतात आणि इंग्रजी बोलायला नाही जमलं तर शाळेत आणि घरी पण आपण त्यांना रागावतो..पण मराठी साठी असे कुठलेच उपाय करताना बघितलं नाही..आणि यापेक्षा भारी म्हणजे काही पालक तर आपल्या मुलांबरोबर बालपणापासूनच हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. त्यांना त्याचा अभिमान पण वाटतो..मग मुलांना नीट मराठी पण येत नाही याची पण जरा काळजी घ्यायला पाहिजे..
या समाजात आणि स्पर्धेच्या जगात इंग्रजी नक्कीच येईल हो मुलांना पण आपली मातृभाषा पण यायला पाहिजे आणि यासाठी मराठी वृत्तपत्रे, मराठी पुस्तके, मराठी मध्ये चित्रपट वा घरी तरी आवर्जून मराठी मध्ये बोलावं..विचार करा🙏
माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवित.
कवी – वि. म. कुलकर्णी.
© स्नेहा